chapter-5

प्रकरण ५ वे हिंदूंवरील हल्ले

नवी दिल्ली आणि इतरत्र उसळलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलींप्रमाणेच गोधरा नंतरच्या गुजरातमधील दंगली मुस्लिमविरोधी होत्या, असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय इंग्रजी दैनिके आणि टी.व्ही. वाहिन्यांनी केला. या दंगली नियोजित पद्धतीने मुस्लिमांना लक्ष्य करून घडविण्यात आल्या आणि फक्त मुस्लिमांवरच हल्ले झाले, मुस्लिमच मारले गेले, या दंगली जणू काही एकतर्फी होत्या आणि केवळ मुस्लिमांनाच नुकसान सोसावे लागले, असे वार्तांकन बहुसंख्य माध्यमांनी केले. इंग्रजी माध्यमांतील पूर्वाग्रहित लोकांनी जाणूनबुजून केलेली ही बदमाषी होती. या प्रकरणात आपण गुजरात दंगलींची दुसरी बाजू म्हणजे हिंदूंवर झालेले हल्ले पाहणार आहोत. पोलिसांच्या नोंदींप्रमाणे ३ मार्च २००२ नंतर १५७ दंगली मुस्लिमांनी सुरू केल्या होत्या. (संदर्भ: ११ मार्च २००३ ला Rediff.com वर फ्रान्सिस गौशियर यांनी लिहिलेला लेख http://www.rediff.com/news/2003/mar/11franc.htm) कट्टर भाजपाविरोधी, मोदीविरोधी असलेल्या राजकीय पक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीने (UPA ने) ११ मे २००५ ला संसदेमध्ये एका लेखी उत्तरात गुजरात दंगलीतील मृतांची आकडेवारी दिली. या अधिकृत आकडेवारीप्रमाणे २००२ च्या गुजरात दंगलीत ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू मृत्युमुखी पडले. साहजिकच प्रश्‍न असा उपस्थित होतो की गुजरातमध्ये या २५४ हिंदूंना कोणी मारले? हिंदू आणि विशेषत: दलितांवर मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यांसंबधी लेखकाने काही स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावाद्यांशी चर्चा केली. तेव्हा मिळालेली उत्तरे चित्तवेधक होती. अहमदाबादमध्ये आणि इतरत्र असलेल्या मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यक होते, त्यापैकी अनेक दलित होते. अशा ठिकाणी मुस्लिमांनी हिंदूंवर (विशेषत: दलितांवर) भयंकर हल्ले चढवून त्यांना ठार केले आणि बेघर केले. एवढेच नव्हे, तर अहमदाबादमधील सिंधी मार्केट आणि भंडेरी पोल सारख्या भागातही मुस्लिमांनी हिंदूवर हल्ले केले. २८ फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरोडा पाटिया, गुलबर्ग सोसायटी आणि इतरत्र मुस्लिमांवर हल्ले 65 होताच, दुसर्‍याच दिवशी, म्हणजे १ मार्च २००२ ला मुस्लिमांचे प्रतिकारी हल्ले सुरू झाले. या सर्व घटनांची माहिती दिल्यानंतर तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लेखकाला म्हटले, ‘‘हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. हिंदूंनी जर नरोडा-पाटियामध्ये त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मारले असेल, तर स्वाभाविकपणे तेही मुस्लिमबहुल क्षेत्रात अल्पसंख्यक हिंदूंवर हल्ले करणारच.’’ स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या या प्रतिसादाचे दोन अर्थ निघतात: १) मुस्लिम जेव्हा हिंदूंवर हल्ला करतात, तेव्हा ते ‘स्वाभाविक’ आणि ‘अपरिहार्य’ असते. कारण २८ फेब्रुवारीला नरोडा पाटियामध्ये हिंदूंनी मुस्लिमांवर हल्ला केला. पण नरोडा पाटियावरचा हल्ला ‘स्वाभाविक’ आणि ‘अपरिहार्य’ ठरत नाही, जो गोधरामध्ये हिंदूंना जिवंत जाळल्यामुळे झाला! २) मुस्लिमांचे हल्ले ‘स्वाभाविक’ आणि ‘अपरिहार्य’ आहेत, असे म्हणत असताना गोधरा नंतरही मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले केले, हे ते मान्य करतात. दंगली अनेक दिवस चालू राहिल्या, तर मुस्लिम ‘अपरिहार्यपणे’ हिंदूंवर हल्ले चढवणार, हे त्यांना माहीत असताना (आणि तसे घडले असताना) गुजरात दंगलीत मुस्लिमांच्या एकतर्फी हत्या झाल्या, असे धादांत असत्य ते का सांगतात? हिंदूंवर, विशेषत: दलितांवर झालेल्या हल्ल्यांकडे ते का दुर्लक्ष करतात? गोधरातील घटना घडली २७ फेब्रुवारीला. त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया उमटली ती २८ फेब्रुवारीला. १ मार्चला, दंगलीच्या दुसर्‍या दिवशी मुस्लिमांचे प्रतिहल्ले सुरू झाले. आपण तिसर्‍या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे ‘द हिंदू’ने २ मार्च २००२ च्या अंकातील बातमीत म्हटले- ‘‘गुरुवारी (२८ फेब्रुवारी) एक समाज संपूर्णपणे मार खात होता. पण आज (१ मार्चला) अल्पसंख्यक समाजाने प्रतिकार केल्यामुळे परिस्थिती जास्त बिघडली. बापूनगर, गोमतीपूर, दरियापूर, शाहपूर, नरोडा (सर्व मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेले भाग) आणि इतर भागात सुद्धा एकमेकांवर दगडफेक करणार्‍या दोन्ही समाजांवर पोलिसांच्या उपस्थितीचा काहीही परिणाम झाला नाही. अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याचे वृत्त असले, तरी जीवितहानी मात्र झाल्याचे वृत्त नाही. दोन्ही समाजातील हा संघर्ष रात्री उशिरापर्यंत चालू होता. जमालपूर भागातील एका प्रमुख मंदिरावर चढविण्यात आलेला प्रतिहल्ला पोलिसांनी मोडून काढला, असे अधिकृत सूत्रांनी म्हटले.’’ ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २ मार्च २००२ च्या अंकात म्हटले- ‘‘(१ मार्चला) आज शुक्रवारच्या प्रार्थनेपूर्वी तटबंदीच्या भागात तणाव वाढण्यास सुरुवात झाली. जमालपूर, बापूनगर आणि राखियाल भागात दोन्ही गटांत हिंसाचार झाला.’’ याचा सरळ अर्थ, मुस्लिम आक्रमक होते, असा होतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या त्याच दिवशीच्या बातमीत म्हटले- ‘‘जुहापुरा, कालुपूर, दरियापूर, शाहपूर या भागांमध्ये प्रतिहल्ले झाल्याचे दिसत होते.’’ यामुळे सर्व शंका दूर होतील. या सर्व बातम्यांचा अर्थ स्पष्ट आहे की, मुस्लिमांचे प्रतिहल्ले सुरू होते. अहमदाबादमध्ये दुसर्‍या दिवशी जे घडले, तो हिंदू-मुस्लिमातील टोकाचा संघर्ष (खोडकर युद्ध, “pitched battles”) होता. अहमदाबादच्या जमालपूर भागातील एका प्रमुख मंदिरावर मुस्लिमांनी हल्ला केला. हिंदू तीन दिवस नियंत्रणा बाहेर होते, असे अनेकांना वाटते, तथाकथित जागृत हिंदूही. ‘गोधरा : द मिसिंग रेज’ (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली) या आपल्या उत्कृष्ट पुस्तकात एस.के.मोदी यांनी म्हटले आहे- ‘‘हिंदू ७२ तास बेभान झाले असले, तरी २८ फेब्रुवारीपेक्षा १ मार्चचा हिंसाचार खूप कमी होता.” सत्य असे आहे की हिंदू बेभान झाले, ते फक्त १ दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीला. पुढील २ दिवसही हिंदूंनी मुस्लिमांवर हल्ले केले, पण मुस्लिमांनीही हिंदूंवर हल्ले केले. ‘इंडिया टुडे’नेही ११ मार्च २००२ च्या अंकात म्हटले- ‘‘अहमदाबादमध्ये (२८ फेब्रुवारीला) महात्मा गांधींच्या नावाने नाव दिलेल्या बापूनगरमध्ये दोन्ही समाजांचे २००० पेक्षा जास्त लोक एकमेकांशी भिडले होते. दोन्ही गटांजवळ तलवारी, काठ्या आणि स्फोटके होती. मृतांची संख्या समजली नाही.’’ ही घटना २८ फेब्रुवारीची आहे, म्हणजे गोधरा हत्याकांडानंतरच्या दुसर्‍याच दिवशीची. या दिवशी जेव्हा सर्व माध्यमे मुस्लिमांवरच अत्याचार चालू असल्याच्या एकतर्फी बातम्या देत होती, त्यावेळी बापूनगरमध्ये दोन हजारहून अधिक मुस्लिम तेवढ्याच हिंदूंविरोधात संघर्ष करीत होते, यांची नोंद ‘इंडिया टुडे’ने घेतली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *